चाकण पोलिसांकडून जबरी चोरीच्या गुन्ह्यांसह खूनाचा गुन्हा उघडकीस; तिघांना अटक

0
1327

चाकण, दि. १५ (पीसीबी) – चाकण पोलीस ठाणे हद्दीत वाढत चाललेल्या जबरी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यात पोलिसांना यश आले असून चोरीच्या ५ आणि खूनाचा एक गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली असून त्यातील एकजण अल्पवयीन आरोपी आहे. आरोपींकडून ४ मोबाईल, २ मोटारसायकली असा एकुण १ लाख २५ हजार रूपयाचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे.

ऋतिक बाळासाहेब गायकवाड (रा. वासुली, ता. खेड) आणि आदिनाथ बाळु राऊत (रा. भांबोली, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात वाढत चाललेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी शनिवारी (दि.११) चाकण पोलीसांचे एक पथक चाकण परिसारत गस्त घालत होते. यावेळी पोलिसांनी संशयीत आरोपी ऋतिक, आदिनाथ आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी चाकण आणि परिसारत एकूण ५ जबरी चोऱ्या केल्याचे कबुल केले. तसेच रविवार (दि. २९ जुलै) रोजी जबरी चोरी करीत असताना सुयश गुंड (वय २३, रा. कोरेगाव भिमा, ता. शिरूर) या तरुणाचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी तिघा आरोपींविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून ४ मोबाईल, २ मोटारसायकली असा एकुण १ लाख २५ हजार रूपयाचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे. तर आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहे.