श्रीहरीकोटा, दि. २२ (पीसीबी) – श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान २ चे प्रक्षेपण आज (सोमवार) दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी करण्यात आले. हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांचा कालावधी लागणार आहे. हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलै रोजी होणारे हे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रोने आज चांद्रयान२ मोहिमेची वेळ निश्चित केली होती.
चंद्रापासून ३० किमी अंतर राहिल्यानंतर चांद्रयान २ चा वेग कमी करण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. हे यान चंद्रावर उतरण्याच्या आधीची १५ मिनिटं महत्त्वाची आहेत, असे के. शिवन यांनी म्हटले आहे. भारत सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास तो जगातील चौथा देश ठरणार आहे. चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने झेपावले आहे.
चांद्रयान २ चे प्रक्षेपण झाल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. चांद्रयान २ या यानाचा हा सुरुवातीचा काळ आहे. सुरुवातीला रॉकेटचा वेग नियमित असणार आहे. चांद्रयान २ ची प्रवास ४५ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा असणार आहे. सुरुवातीचे २३ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेतच असणार आहे. २५० वैज्ञानिक या यानावर लक्ष ठेवून असणार आहेत.