मुंबई, दि. २० (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. चंद्रकांत पाटील ग्रामीण भागातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्यास, मी त्यांच्या विरोधात उभा राहणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. राजू शेट्टी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भूमिका मांडली.
“आगामी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. मात्र अजून माझी मानसिकता झालेली नाही. जर चंद्रकांत पाटील हे ग्रामीण भागातून विधानसभा निवडणुक लढविणार असल्यास, मी त्यांच्या विरोधात उभा राहणार,” असे राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “देशभरातील तरुणांच्या हातचा रोजगार गेला आहे. यावर केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौर्यावर आले असताना, किमान ते तरी तरुणाच्या प्रश्नांवर बोलतील अशी शक्यता होती. मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे भाषण करून जनतेची दिशाभूल केली आहे. यामुळे आता तरुणांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे”.