‘चंद्रकांतदादांचे पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा- संजय राऊत

0
234

मुंबई, दि. ४ (पीसीबी): शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या अग्रलेखातील भाषेवरुन भाजप नेते नाराज आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावरुन सामनाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे यांना नुकतच एक पत्र लिहिलं आहे. या पत्रावरुनच आता संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे.

‘चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरु केली आहे. प. बंगालातील भाजप नेत्यांची अलीकडची भाषणे दादांच्या हवाली करुया. तेथे भाषाशुद्धीसंदर्भात मोठे काम चंद्रकांत पाटलांना करावे लागणार आहे. चीनने लडाखची जमीन गिळली तरी चालेल, पण मुंबईतल्या इंच इंच जमिनीसाठी किटल्यांनी उकळायलाच पाहिजे! दादा, उचला लेखणी, करा त्या ढोंगावर हल्ला! महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे!’, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत, पण चायपेक्षा किटली गरम असे काही लोकांचे सुरु आहे. उठसूट फक्त विरोध, दुसरे काही नाही. “मुंबईतील महाकाली गुंफा विकू देणार नाही, एक इंचही जागा बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही”, अशा विरोधी वक्तव्याच्या उकळ्या काही किटल्यांना फुटल्या आहेत. भाजपच्या ध्यानीमनी, स्वप्नी बिल्डरच आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही निर्णयात बिल्डरच दिसत असावेत. राज्य सरकारने कोणताही निर्णय घ्यायचा म्हटलं की, ‘ब्लॅकमेल’ करणारी किरकिराटी मांजरे आडवी घालायची, हे जणू धोरणच झाले आहे, अशी टीका राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेत्यांवर केली आहे.