गेल्या विधानसभेला भाजपने जिंकलेल्या जागेपैकी एकही जागा भाजप सोडणार नाही- रावसाहेब दानवे

0
297

औरंगाबाद, दि. २४ (पीसीबी) – गेल्या विधानसभेला भाजपने जिंकलेल्या जागेपैकी एकही जागा भाजप सोडणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

युतीसाठी शिवसेना-भाजपचा ५०-५० फॉर्म्युला ठरला आहे. मित्रपक्षाचे काय करायचे ते ऐनवेळी ठरवू असेही दानवेंनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात जागा वाटपावरुन शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची भाजपची भूमिका असल्याचेही दानवेंनी सांगितले. मुख्यमंत्री पदाबाबत आमचे ठरले असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री पदावरुन सध्या भाजप आणि शिवसेनेचे नेते सूचक इशारे करत असल्याचे पाहायला मिळत आहे.  शिवसेना आणि भाजपात सगळं समसमान पाहिजे, असे सूचक विधान उद्धव ठाकरेंनी नुकतेच शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केले होते. तर वाघ सिंहाची जोडी एकत्र येते त्यावेळी कुणी राज्य करावे हे सांगावे लागत नाही. आम्हाला सत्ता पदांकरिता नको आहे तर लोकांच्या सेवेसाठी हवीय. आमच्यासाठी मुख्यमंत्री पद गौण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते.