पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – कामगारांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यव्यापी गुणवंत कामगार कल्याण विकास परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तसेच परिषदेच्या अध्यक्षपदी भारती चव्हाण आणि कार्याध्यक्षपदी कामगार नेते यशवंत भोसले यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेमार्फत नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती यशवंत भोसले यांनी दिली.
यशवंत भोसले म्हणाले, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यातून सुमारे ५०० गुणवंत कामगारांची दरवर्षी निवड करण्यात येते. कारखान्यांमध्ये प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करत असताना उर्वरिते वेळेमध्ये जे कामगार समाजाची सेवा करतात. देश हिताच्या कर्तव्याकरिता तत्पर असतात अशा राज्यातील कामगारांमधून गुणवंत कामगारांची निवड करण्यात येते. राज्यातील सर्व गुणवंत कामगारांना संघटित करुन त्यांना शासन दरबारी योग्य तो सन्मान मिळावा. तसेच समाजाची सेवा करत असताना त्यांना येणा-या विविध अडचणींना शासनाने सहकार्य करावे. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. जेणेकरुन समाजाची सेवा या गुणवंतांकडून अधिक उत्तम होईल. त्यासाठी सर्व गुणवंताची राज्यव्यापी परिषद स्थापन करण्यात आली आहे.
परिषदेच्या नियोजन समितीवर गुणवंत कामगारांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शिवाजीराव शिर्के, सुरेश कंक, राज अहिरराव, मोहन गायकवाड, तानाजी एकोंडे, रामकृष्ण राणे, राजेश हजारे, आकाश घोरपडे, स्वानंद राजपाठक, सोमनाथ पतंगे, पंकज पाटील, भरत शिंदे, विजयसिंह राजपूत, आशफिया सय्यद, श्रीकांत जोगदंड, कल्पना भोईंगडे, सुभाष चव्हाण, सुरेश केसरकर, सुहास वडीकर, ज्ञानेश्वर कातोरे
जानेवारी महिन्यात गुणवंत कामगार विकास परिषदेचे दोन दिवसीय अधिवेषन घेण्याचे नियोजित आहे. अधिवेशनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे यांना निमंत्रण दिले जाणार आहे.