“गुजरात मॉडेलपेक्षा मुंबई मॉडेलवर बोला. आयुक्त परदेशीची बदली का केली?” : भाजपचा अग्रलेखावरून राऊतांना रोकडा सवाल

0
240

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबात पुन्हा एकदा टीकासत्र सुरु झाल आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज अग्रलेख लिहून गुजरातच्या बदललेल्या मुख्यमंत्र्यावरुन भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या याच टीकेला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा मॉडेलवर बोला, असा सल्ला त्यांनी राऊतांना दिलाय. गुजरातचा मुख्यमंत्री का बदलला हा आमच्या पक्षाचा विषय आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा तुम्ही मुंबई मॉडेलवर बोला ना… तुम्ही भर कोरोनाकाळात आयुक्त परदेशी यांची बदली का केली?, असा उलटसवाल नितेश राणे यांनी राऊत यांना विचारला.

‘गुजरात मॉडेलपेक्षा मुंबई मॉडेलवर बोला ना…, आयुक्त परदेशीची का बदली केली होती ? मुंबई मॉडेलमध्ये इतके मृत्यू झालेलं आहेत. तुम्ही तुमच्या मुंबई मॉडेलवर बोलून जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्या’, असं नितेश राणे यांनी ट्विट करुन संजय राऊतांना चिमटा काढला आहे. मागील अनेक दिवसांपासून राणे-शिवसेना संघर्ष सुरु आहे. याच संघर्षातून राणेंना अटकेला सामोरं जावं लागलं. हे संपूर्ण प्रकरण देशात चर्चिलं गेलं. जनआशीर्वाद यात्रा संपली तशी राणेंची टीकेची भाषा देखील मवाळ झाली होती. आता राऊतांच्या अग्रलेखानंतर पुन्हा एकदा राणेंनी बाह्या सरसावल्या आहेत.

“गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?”, असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून विचारला आहे. कुठं काय बदलायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

गुजरातमध्ये बेरोजगारीचा भस्मासुर नाचतो आहे. अनेक मोठे उद्योग बंद पडले आहेत. अहमदाबादजवळच्या ‘फोर्ड’ गाड्या बनवणाऱ्या कंपनीने गाशा गुंडाळला व 40 हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले. संपूर्ण गुजरातमधील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण आक्रोश करीत आहेत व निवडणुकांत या संतापाचा फटका बसेल ही खात्री असल्यानेच मुख्यमंत्री रुपाणी यांना बदलून भूपेंद्र पटेल यांना नेमले. ही फक्त रंगसफेदीच आहे. भूपेंद्र पटेल हे आनंदीबेन पटेल यांचे समर्थक आहेत. रूपाणी यांच्यामागे अमित शहा होते. त्यामुळे गुजरातमधील उद्याचे राजकारण जितके गोंधळाचे तितकेच रोचक असेल.

भूपेंद्र पटेल यांची निवड आमदारांकडून एकमताने झाली, पण भूपेंद्र यांनाही आपण मुख्यमंत्री होतोय हे माहीत नव्हते. गेल्या चार वर्षांत त्यांना साधे मंत्रीही केले नव्हते. ते एकदम मुख्यमंत्रीच झाले. दिल्लीहून नाव आले व ते भाजपच्या विधिमंडळ पक्षाने मान्य केले. नेता निवडीसाठी आमदारांनी मतदान केले असते तर दुसऱ्याच एखाद्या नावावर पसंतीची मोहोर उठली असती. काँग्रेस पक्षातही हे असेच घडते व यालाच आपल्याकडे लोकशाही म्हणावे लागते. लोकशाहीचे, राज्यकारभाराचे व विकासाचे गुजरात मॉडेल अशा प्रकारे फुगा फुटावा तसे टपकन फुटले आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?