गुंड राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची हवी होती; तनुश्री दत्ताचा आरोप

0
635

मुंबई, दि. १ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिवंगत  शिवसेना पक्ष प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची हवी होती. मात्र, खुर्ची मिळाली नसल्याने ते तोडफोड करत आहेत. नालायक माणूस जेव्हा स्वतःला लायक ठरवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो, अशा शब्दांत अभिनेत्री  तनुश्री दत्ता हिने  आरोप केला आहे. त्यामुळे नाना पाटेकर-तनुश्री दत्ता वादाला  नवे  वळण  लागण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी माझी कार फोडली, असा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. तर नाना पाटेकरांनी मला मनसे कार्यकर्त्यांना हाताशी धरून धमकावण्याचा प्रयत्न केला होता, असेही तनुश्रीने म्हटले होते. आता  तिने थेट राज ठाकरेंवरच आरोप केले आहेत.

मुंबईत तनुश्री दत्ता पत्रकार परिषद बोलताना म्हणाली की, राज ठाकरेंना ‘सरकार राज’ आणायचे आहे. तर नाना पाटेकर हा चिंधी अभिनेता आहे, त्याने आणि राज ठाकरेंनी एकत्र येत मला छळले आहे, असा आरोप तनुश्री दत्ताने केला. राज ठाकरे गुंड आहेत, त्याने आपल्यासारखेच गुंड पक्षात घेतले आहेत, त्यांना तो तोडफोड करण्यासाठी ठिकठिकाणी पाठवत असतो, असाही आरोप तनुश्री दत्ताने केला आहे.

नाना पाटेकर यांना कोणतीही अभिनेत्री भाव देत नाही. त्यामुळे तो मुलींसोबत गैरवर्तन करतो. नाना पाटेकरजवळ एका तरी मुलीला फिरकताना पाहिले आहे का? एक नालायक माणूस आणि एक अभिनेता बनता बनता मागे राहिलेला माणूस यांनी अभद्र युती केल्यावर काय होणार? महिलांना त्रासच होणार त्यांची छेडछाडच केली जाणार, असेही तनुश्रीने म्हटले आहे.