गांधी शांती यात्रेचे पिंपरीत जोरदार स्वागत

0
475

पिंपरी, दि.१० (पीसीबी) – नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा ही नागरिकांची व सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे. त्यानिमित्त जनजागृती करण्यासाठी ‘‘गांधी शांती यात्रा’’ सुरु करण्यात आली आहे. महात्मा गांधीजींचे आफ्रिकेतून आल्यानंतर ९ जानेवारीला गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे आगमन झाले होते. त्या दिवसाचे औचित्य साधून ‘‘गांधी शांती यात्रा’’ सुरु करण्यात आली आहे. आर्थिक आघाडीवर मोदी सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. गेली सहा वर्ष जीडीपी दर घसरत चालला आहे. त्यावरील नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नागरिकत्व हक्क सुधारणा कायदा व सीएए कायदा सरकारने आणला आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली.

गुरुवारी (दि.९) मुंबई येथून निघालेल्या ‘गांधी शांती यात्रेचे’ स्वागत निगडी येथे पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले. यशवंत सिन्हा म्हणाले की, जेएनयूमधील झालेल्या हिंसक घटनेबाबत देशभर विद्यार्थी व युवकांमध्ये तीव्र असंतोष आहे. सरकारच्या मनमानी  कारभाराविरूद्ध युवकांनी आवाज उठविलाच पाहिजे. यासाठी जनजागृती करण्यासाठी तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून सहा राज्यातून हि यात्रा ३० जानेवारीला  महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी दिल्लीत पोहचेल, अशी माहिती सिन्हा यांनी दिली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशातील सामाजिक सलोखा बिघडला आहे. केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांना संघटीत करून  शांततेच्या मार्गाने ही यात्रा जनजागृती करणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना सुरुवातीला काही अडचणी जरूर आल्या. परंतू आता  सरकारचे कामकाज सुरळीतपणे सुरु आहे. हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असाही विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.  

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे,  महिला कॉंग्रेस कमिटीच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, निगार बारसकर, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, सुनील शिंदे, सुनील शिर्के, देवानंद बांदल, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंखे, सुनील राऊत, हिरामण खवळे, बाबा बनसोडे, किशोर कळसकर, संदेश नवले, आबा खराडे, कुंदन कसबे, मिना गायकवाड, आशा गायकवाड, संदेश बोर्डे, भाऊसाहेब मुगुटमल, सतीश भोसले, महादेव पुरी, सुनीन नेटके, वैभव किरवे, चंद्रशेखर जाधव, संजय बालगुडे, सतीश चव्हाण, विनायक जाधव, सुनील शेंडे, प्रमोद भोसले आदी उपस्थित होते.