Maharashtra

गल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होतात; प्रकाश आंबेडकरांचा रामदास आठवलेंना टोला

By PCB Author

December 10, 2018

मुंबई, दि. १० (पीसीबी) – गल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होत असतात, अशी उपरोधिक टीका  भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर केली आहे.  दोन दिवसांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ  येथे एका तरूणाने हल्ला केला होता. त्यावर आंबेडकर यांनी आठवले यांना टोला लगावला.  

आपल्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आठवले यांनी माझी प्रगती काही जणांना पाहवत नाही. माझ्यावर हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावीमागे कोणाचे हात आहेत, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यावर आंबेडकरांनी आठवलेंना टोला लगावला आहे.

अंबरनाथ येथे एका कार्यक्रमाला आठवले आले होते. त्यावेळी प्रवीण गोसावी या तरुणाने त्यांना धक्काबुक्की केली होती. त्यानंतर आठवलेंच्या समर्थकांनी गोसावीला बेदम मारहाण केली होती. गोसावी हा मुळचा अमरावती जिल्ह्यातील असून सध्या अंबरनाथ येथे राहतो. तो बांधकाम व्यावसायिक आहे. तो काही काळ रिपाइंत (आठवले गट) सक्रिय होता. तेथूनही तो बाहेर पडून भारिप बहुजन महासंघाचे काम करत आहे.