Maharashtra

गणेश नाईकांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादी संपवली – जितेंद्र आव्हाड

By PCB Author

July 30, 2019

मुंबई, दि, ३० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे नेते अशी ओळख असलेले गणेश नाईक भाजपात प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर सडेतोड टीका केली असून गणेश नाईक यांनी अत्यंत पद्धतशीरपणे राष्ट्रवादी संपवली असा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी आपण वारंवार कल्पना देऊनही पक्षाने कधी आमच्यावर विश्वास ठेवला नाही अशी खंतही व्यक्त केली.

जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, “२०१४ साली जेव्हा ऑपरेशन झाले तेव्हाच गणेश नाईक यांना पक्ष सोडायचा होता. गणेश नाईक यांच्या मांडीच्या हाडाचे ऑपरेशन होते आणि तिकडे बैठक चालू होती. तेव्हा शरद पवारांनी घरी बोलावून सांगितले की, गणेश नाईक कधीच गद्दारी करणार नाहीत हे पत्रकार परिषद घेऊन सांग. त्यानंतरच्या घडामोडी सांगू शकत नाही”.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यामुळेच कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर येथे राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नसल्याचा आरोप केला. “कल्याण डोंबिवलीत आणि मीरा भाईंदरमध्ये सत्ता असतानाही आणि भिवंडीत चांगली ताकद असतानाही आमचा एकही आमचा नगरसेवक नाही. आणि सगळ्याची जबाबदारी कोणावर होती तर गणेश नाईक यांच्यावर होती”, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.