गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफी

0
455

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी चांगली बातमी आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांकडून टोल न आकारण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या हजारो नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

या निर्णयानुसार, कोकणात जाण्यासाठी ११ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूली केली जाणार नाही. याशिवाय कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाही टोल फ्री प्रवास करता येणार आहे. गणेशभक्तांना परतीचा प्रवासही टोल फ्री होणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. टोलमाफी केल्यामुळे वाहने टोलनाक्यांवर थांबणार नाहीत.  त्यामुळे वाहतूक कोंडीतून काही अंशी वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान,  गेल्यावर्षीही राज्य सरकारने गणेशोत्सव काळात गणेशभक्तांसाठी अशाचप्रकारे टोल माफी केली होती.