गड-दुर्गांवरील लॅण्ड जिहाद रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे मागणी…

0
410

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्यातील 300 हून अधिक गड-दुर्ग हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहे; मात्र पुरातत्त्व विभाग आणि राज्य नि केंद्र शासन यांच्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे हा ऐतिहासिक ठेवा इस्लामी अतिक्रमणांच्या विखळ्यात अडकत चालला आहे. नुकतेच रायगड, विशाळगड, कुलाबा किल्ला, लोहगड, वंदनगड आदी गड-दुर्गांवर अशी अतिक्रमणे असल्याचे लक्षात आले आहे. हे वेळीच रोखले नाही, तर गड-दुर्गांवर कबरी, दर्गे आणि मशिदी उभा राहिलेल्या दिसतील. गड-दुर्गांचे हे इस्लामीकरण रोखण्यासाठी त्यांवरील सर्व अवैध थडगी, मजारी, दर्गे, मशिदी आदी हटवण्यात याव्यात. गड-दुर्गावर होत असलेला एकप्रकारचा लँड जिहाद रोखावा, या मागणीसाठी राज्यातील समस्त शिवप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि दुर्गप्रेमी यांनी एकत्र येऊन राज्यव्यापी ऑनलाईन आंदोलन केले. या वेळी प्रशासन, पुरातत्त्व खाते आणि केंद्र अन् राज्य शासन यांना निवेदने देण्यात आली.

राज्यभरात विविध गडांच्या पायथ्याशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. या आंदोलनात गड किल्ले हिंदूंच्या अस्मिता आहे, त्याचे इस्लामीकरण खपवून घेतले जाणार नाही !, गड-किल्ल्यांची दुरावस्था असतांना पुरातत्त्व खाते काय झोपा काढत आहे का ?, हिंदू बांधवांनो जागे व्हा, आपल्या गड-दुर्गाच्या रक्षणासाठी एक व्हा ! आदी विविध हस्तफलक हातात घेऊन जागृती करण्यात येत होती. हिंदु जनजागृती समितीने याविषयी ट्वीटरवर केलेल्या #SaveForts_OpposeLandJihad या ट्रेंडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा विषय ट्वीटरवर चौथ्या स्थानी ट्रेडींगवर होता. या आंदोलनाला युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवून किल्ले पूर्ववत न केल्यास जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल ! – रघुजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे 9 वे वंशज
पुरातत्त्व खात्याचे कडक नियम असतात. पुरातत्व खात्याच्या अनुमतीनेच कुठलीही ऐतिहासिक वास्तू, किल्ला यांच्या संवर्धनाची कामे करता येतात; मात्र मुंबईजवळील कुलाबा किल्ल्याच्या थेट तटबंदीवरच एक मजार (थडगे) बनविण्याचा प्रयत्न व्हावा, हा एक वेगळाच उन्माद आहे. थडगे बांधून अतिक्रमण करण्याच्या केलेल्या प्रयत्नाला आमचा विरोध आहे. पुरातत्व खात्याने अतिक्रमण करणार्‍यांविरोधात खटले दाखल करून हे अतिक्रमण पूर्ण नष्ट करावे आणि किल्ला पूर्ववत स्थितीत करावा अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जावे, अशी चेतावणी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे 9 वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दिली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गड-दुर्गांवर इस्लामी आक्रमण-पुरातत्व खाते करतेय काय? या विषयावर ऑनलाईन विशेष संवादही आयोजित केला होता, त्यामध्ये ते बोलत होते.

या वेळी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि सांगली येथील माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की,* महाराष्ट्रात अफझलखानाच्या नावे ट्रस्ट उभा केला जातो. महाराष्ट्रात प्रतापगड, विशाळगड, रायगड यांसह अनेक गडांवर अनधिकृत दर्गे उभारले जातात आणि त्याचे रूपांतर नंतर मोठ्या मशिदीत केले जाते. हे सर्व होऊ देणार्‍या पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांना महाराष्ट्रातील जनतेने जाब विचारला पाहिजे !

कोल्हापूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर म्हणाले की,* विशाळगडावर साधारणतः 64 ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. गडावरील मंदिरांकडे पुरातत्व विभागासह प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रात ज्या गड-किल्ल्यांच्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत, त्यात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करुन ही सर्व अतिक्रमणे नष्ट करावीत.

झूंज प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष मल्हार पांडे म्हणाले की,* ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी आपण पुढे येणे गरजेचे आहे; कारण असे केले नाही तर, आपला जो इतिहास आहे, तो काळाच्या पडद्याआड जाईल. केंद्र सरकार आणि केंद्रीय पुरातत्व खाते यांना पुराव्यांनिशी निवेदन दिल्यास आणि पाठपुरावा घेतल्यास नक्कीच बदल घडेल, यांविषयी आम्हाला विश्‍वास आहे.

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले की,* छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळातील 300 हून अधिक गड-किल्ले आहेत, मात्र त्यांचे आता रक्षण होताना दिसत नाही. गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे होत असून त्याचे हिरवेकरण होत आहे. रायगड, विशाळगड, प्रतापगड, शिवडी, कुलाबा यांसह महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांच्या ठिकाणी अनधिकृत मजार, दर्गा, मशिदी उभारुन अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे दाखल करायला हवेत, तसेच या अतिक्रमणाला जबाबदार पुरातत्व खात्यातील संबंधित दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.