मुंबई, दि. १२ (पीसीबी) – आगामी लोकसभेची निवडणूक ही भाजपासाठी नव्हे, तर भारतासाठी महत्वाची आहे. त्यामुळे देशातील जनतेने महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेवर आणण्यापेक्षा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताने सत्तेत आणावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या ५ वर्षांत देशाने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत. २०१९ हे वर्ष भारताचे भविष्य आणि भवितव्य खऱ्या अर्थाने कुठे जाईल हे ठरवणारे आहे. तसेच २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये असलेले अनेक लोक भाजपमध्ये आले आहेत. काँग्रेस हा रिकामा पक्ष आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
आगामी निवडणुकीत महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेवर आले, तर भारताची ती ऐतिहासिक चूक असेल, देश १०० वर्षे मागे जाईल. यापूर्वीचे पंतप्रधान हे कुठलाही निर्णय घेऊ शकत नसत. त्यांना कोणाला तरी विचारल्याशिवाय त्यांना बोलताही येत नसत. पाच वर्षांत निर्णय न घेणे यामुळे देशाचा विकास खुंटला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव न घेता केली.