खासदार बारणे यांचे आत्मप्रौढी राजकारण, जनतेत नाराजी असलेल्या उमेदवाराचे काम का करायचे; भाजपचा सवाल

0
646

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना आपण फार लोकप्रिय नेते असल्याचा वारंवार भास होतो. त्यांच्या बगलबच्च्यांना बारणे हे फार मोठे नेते असल्याची आणि ते नक्की खासदार होणार, अशी स्वप्ने पडतात. एवढीच लोकप्रियता होती आणि ते फार मोठे नेते होते, तर महापालिका निवडणुकीत त्यांना चार नगरसेवक तरी निवडून का आणता आले नाहीत? असा पलटवार सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे. बारणे हे नेहमी स्वतःच्या आत्मप्रौढी राजकीय विश्वात जगत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांचे नुकसान होत आहे. बारणे यांनी मावळ मतदारसंघात कोणतेच काम केलेले नाही. केवळ पक्षांतर्गत भांडणे लावण्यातच त्यांनी खासदारकीची टर्म वाया घालवली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे. जर मतदारांनी त्यांना नाकारले, तर भाजपचेही नुकसान होणार आहे. तसेच बारणे हे पराभवाचे खापर भाजपवर फोडण्यास मोकळे होतील. बारणे हे काही शिवसेनेचे निष्ठावान नाहीत. ते काँग्रेसमधूनच शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे जनतेत नाराजी असणाऱ्या आणि भाजपला कधीही विश्वासात न घेणाऱ्या उमेदवाराचे आम्ही काम का करायचे?, असा सवालही पवार यांनी केला आहे.