पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – आता स्वतःची कार असणाऱ्यांना प्रवासी वाहतूक करता येणार आहे. तसेच त्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येणार आहे. कारण, केंद्र सरकार परिवहन कायद्यात मोठा बदल करण्याच्या विचारात आहे. ‘व्हेइकल पूलिंग’योजना आणण्याची तयारी सरकारने केली आहे.
देशभरात खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ट्रॅफिक आणि पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून खासगी गाड्यांचा वापर कमर्शियल ( व्यावसायिक ) कारणासाठी करता यावा, यासाठी परमिट जारी करण्याचा विचार सुरू आहे.
याबाबत नीति आयोगाने एक पॉलिसी तयार केली आहे. मात्र, ही सेवा सुरू करण्यासाठी कार मालकांना काही नियम आणि अटींची पूर्तता करावी लागणार आहे. खासगी कारचालक दिवसाला ३ ते ४ फेऱ्याच कमर्शियल ट्रिपच्या करू शकतो, अशी अट लावली जाणार आहे.
प्रवाशांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी खासगी वाहनांसाठी नियमावली तयार केली जाणार आहे. त्यासाठी खासगी वाहन चालकांना राज्य परिवहन विभागातील मान्यता प्राप्त समीक्षकाकडून एक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. समीक्षकाकडे वाहनाचा पूर्ण तपशील असेल जेणेकरुन कार मालक एका दिवसात तीन किंवा चार पेक्षा अधिक फेऱ्या मारु शकणार नाही.
त्याचबरोबर नियम तोडल्यास तातडीने त्यावर कारवाई करता येणे शक्य होईल. याशिवाय खासगी कार मालकांना भाडे घेण्याआधी प्रवाशांचा विमाही उतरविणे बंधनकारक असेल. सरकारकडून भाडे निश्चित करणार नाही, तर भाडे निश्चिती बाजारातील भावानुसार असेल.