खरेदीसाठी गर्दी न करता घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
425

 

मुंबई, दि.२ (पीसीबी) – इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आता तरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करून ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार या सर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. खरेदीसाठी गर्दी न करता घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

अजित पवार यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. यात ते म्हणतात, राज्यातली ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजी खरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर ‘लॉकडाऊन’चा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरूच ठेवले तर, सद्यस्थितीचा पुनर्विचार करून कठोर उपाय योजावे लागतील.

पुढे पवार म्हणतात, ‘राज्यातले बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत. मात्र, बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हे आता सहन केले जाणार नाही. बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही’.

पवार म्हणतात, राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलीस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसूल विभाग, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसंच शासनाची संपूर्ण यंत्रणा ‘कोरोना’विरोधात युद्धपातळीवर काम करत आहे. या सर्वांचे मी आभार मानतो!