कौटुंबिक वादातून जावयाने पत्नीसह सासू-सासऱ्यांवर केले कोयत्याने वार; सासऱ्याचा मृत्यू

0
592

कोल्हापूर, दि. १७ (पीसीबी) – कौटुंबिक वादातून जावयाने पत्नी आणि सासू- सासऱ्यांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झाला असून सासू आणि पत्नीची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रविवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील जवाहरनगर परिसरात घडली असून हल्ल्यानंतर जावई पसार झाला आहे.

अनिल पाटील असे आरोपी जावयाचे नाव आहे. या घटनेमध्ये सासरे धोंडीराम रावण यांचा मृत्यू झाला आहे. तर सासू राधा रावण आणि पत्नी रुपाली या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोंडीराम यांची मुलगी रुपाली हिचे अनिल पाटील याच्याशी १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. धोंडीराम आणि अनिल यांचे घर जवळच आहे. रुपाली आणि अनिलला पाच वर्षांची मुलगी देखील आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिल आणि रुपालीमध्ये कौटुंबिक वाद सुरु होते. रविवारी देखील त्यांच्यात वाद झाला होता. यामुळे रुपाली तिच्या माहेरी गेली होती. रात्री उशिरा अनिल सासरे धोंडीराम यांच्या घरी गेला. त्याने सासरे धोंडीराम, सासू राधा आणि पत्नी रुपाली या तिघांवर कोयत्याने वार केले. यामध्ये सासरे धोंडीराम यांचा जागीच मृत्यू झाला तर राधा आणि रुपाली गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या हल्ल्यातून त्याची पाच वर्षांची मुलगी बचावली. हल्ल्यानंतर अनिल पसार झाला. इचलकरंजी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.