‘कोळसा आणि २ जी घोटाळ्यात राहुल – सोनिया गांधींना जेलमध्ये का टाकले नाही’ – रंजन चौधरी

0
517

दिल्ली, दि, २४ (पीसीबी) – लोकसभेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अधिवेशन सुरु आहे. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी भाजपवर आणि पंतप्रधान मोदींवर चांगलीच टोलेबाजी केली आहे. यावेळी बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी विविध मुद्द्यावरुन भाजपाला टीकेचे लक्ष्य केले.

यावेळी रंजन चौधरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे विक्रेते आहेत. आम्ही आमचे प्रोडक्ट विकण्यास असमर्थ ठरलो तर दुसरीकडे भाजपाने त्यांच्याकडील खराब प्रोडक्टही चांगल्यारितीने विकले आहेत. तसेच कोळसा आणि २ जी घोटाळ्यामध्ये आजतागायत तुमच्या सरकारने कोणालाही पकडले नाही. आजपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी जेलच्या बाहेर कसे? त्यांना तुरुंगात का टाकत नाही? असा खवचट प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.

तर देशात सगळीकडे पाणीसंकट आहे आणि बिहारमध्ये चमकी तापामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना काहीच फरक पडत नाही. त्यामुळे नवीन खासदारांना विश्वास आहे की, आपल्याला काही करण्याची गरज नाही फक्त मोदी बाबावर विश्वास ठेवा ते सगळं करतील. मोदी नावाची पूजा केल्याने सर्व समस्या सुटतील असा विचार नव्या खासदारांचा आहे, असा टोला चौधरी यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. तुम्ही आमच्या नेत्यांची नावे घेत नसाल तर तुमच्या सरकारवर आमचा विश्वास कसा असेल? असा देखील प्रश्न त्यांनी यावेळी भाजप नेत्यांना विचारला.