कोल्हापूर –रत्नागिरी रस्त्याजवळील तलावात तवेरा गाडी कोसळली; ५ ठार

0
1369

कोल्हापूर, दि. २४ (पीसीबी) – कोल्हापूर –रत्नागिरी रस्त्यावर जोतिबा फाट्याजवळ तवेरा गाडीचा पाठीमागील टायर फुटून गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या रेडेडोहात जाऊन कोसळली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी आहेत.  मृतांमध्ये १ महिला आणि ४ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. आज (शनिवारी) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास  ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरज येथील दत्त कॉलनीमधील रहिवाशी असलेले तांदळे कुटुंबीय रत्नागिरी आणि मार्लेश्वरला गेले होते. त्यानंतर घरी परत असता जोतिबा फाटा येथे त्यांच्या  तवेरा  गाडीचा  पाठीमागील टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.  त्यानंतर ही गाडी जवळच्या रेडे डोहात कोसळून पूर्णपणे पाण्यात बुडाली. या भीषण अपघातात कारमधील १ महिला आणि ४ अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला. तर २ मुले जखमी झाले आहेत, त्यांना उपचारांसाठी कोल्हापूरातील सीपीआर  रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील जीवन ज्योत संस्थेच्या जवानांनी, व्यवस्थापन प्रमुख प्रसाद सकपाळ, अग्निशामक दलाचे प्रमुख बांदेकर आणि सहकाऱ्यांनी  बेपत्ता लोकांचा शोध  घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

अश्विनी सुनील तांदळे (वय २६), अनिषा सुनील तांदळे (१४), श्रावणी सुनील तांदळे (३), धनश्री शशिकांत माने (७), जान्हवी सुनील तांदळे ( वय ७, सर्व रा. दत्त कॉलनी, मालगाव रोड, मिरज) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर आदर्श नितीन तांदळे (वय ५), ओम सुनील तांदळे (वय ३) या बालकांवर   अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त मोटारीतील अन्य काही प्रवासी बेपत्ता आहेत. त्यांची शोध सुरु आहे.

श्रेयश रावसाहेब आडमुठे (वय ४), संगिता रावसाहेब आडमुठे (३५), अविराज आनिल तांदळे (११), रोही शशिकांत माने (६), अलका शशिकांत माने (२७), जयश्री अनिल तांदळे (२९), आदर्श नितीन तांदळे (५), ओम सुनील तांदळे (१.५), पूनम सुनील तांदळे (२८), किरण सुभाष माने (१८), धनश्री शशिकांत माने (८), जान्हवी सुनील तांदळे (६), अश्विनी नितीन तांदळे (२५), अनिशा अनिल तांदळे (१४), श्रावणी सुनील तांदळे (३), चालक वैभव वसंत वाणकर (सर्व राहणार मालगांव रोड, दत्त कॉलनी, कवठेमहांकाळ, मिरज) हे  लोक प्रवास करत होते.