कोल्हापूर, दि. १० (पीसीबी) – साखर कारखान्याच्या दूषित पाण्याच्या प्रश्नावरुन कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना घागरी फेकून मारण्याचा प्रयत्न आज (शनिवार) झाला. कागल तालुक्यातील काळम्मा बेलेवाडी ग्रामस्थांनी हसन मुश्रीफ यांना घेराव घातला.
कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे घरामध्ये दूषित पाणी येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. महिलांसह हजारो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. आमदार हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यात यावेळी बाचाबाचीही झाली.
दरम्यान संतप्त झालेल्या जमावाने हसन मुश्रीफ यांच्यावर घागरी फेकून मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.