‘कोरोना सेवेतील मृत योध्द्यांच्या वारसांना एक कोटी रुपये कधी मिळणार?’ – भाजप कामगार आघाडीच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन

0
243

पिंपरी दि.१९ (प्रतिनिधी) – कोरोना सेवेत कोरोनाने मृत्यु झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत व केंद्र सरकारची ५० लाख रुपयांची अशी एकुण मिळुन प्रत्येकी एक करोड रुपयांची आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले. अद्यापही त्यांच्या वारसांना मदत मिळाली नसल्याने भाजप कामगार आघाडीच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांची भेट घेतली. सर्व पीडित कामगारांच्या वारसांना लवकर मदत करण्याची मागणी केली. आयुक्तांनीही याची दखल घेत लवकरच आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन दिल्याचे प्रसिध्दीपत्रात म्हटले आहे.

भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष प्रकाश मुगडे यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिकेत आयुक्तांशी भेट घेतली. याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आयुक्त व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मृत कोरोनायोद्धा कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देणार, अशी ग्वाही दिली आहे. सध्या कोरोना सेवेत काम करत असणाऱ्या कामगारांना, घरोघरी सर्व्हेक्षण करणाऱ्या कामगारांना आणि यात सहभागी सामाजिक संस्थांनाही रुपये पन्नास लाखाचे आर्थिक कवच देण्याचे आश्वासन दिले आहे.

भाजप कामगार आघाडीच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे त्यात असे म्हणले आहे की, “पिंपरी चिंचवड शहरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू असताना आपल्या जीवाची कसलीच पर्वा न करता रुग्णांना विलगीकरण करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह पालिकेतील सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्गाने रुग्णांना जेवण, नास्ता, औषध पुरविणे तसेच रुग्णांची योग्य व्यवस्था करत असताना अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यात महापालिकेतील सहाय्यक आयुक्त, शिपाई, चालक- वाहक कर्मचारी यांचा समावेश झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या आरोग्याची व जीविताची काळजी घेताना या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा व आपल्या कुटूंबियाचा कसलाही विचार केला नव्हता. खुप कठीण काळात “कोरोनायोद्धे” बनत त्यांनी अनेकांचे जीव वाचवले. त्यावेळी आपण कोरोनामुळे मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. आजतागायत पालिकेतील एकुण १८ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु झालेला असताना त्यांच्या वारसांना ही आर्थिक मदत अद्यापही मिळालेली नाही. त्यासाठी प्रभावी पाऊले उचलली जात नाहीत, असे भाजपच्या वतीने निदर्शनास आणून दिले. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखाची आर्थिक मदत करत अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी याचा आपण गांभीर्याने विचार करावा, असेही पत्रकात म्हटले आहे.