कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन, पण तज्ञ म्हणतात…

0
327

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : कोरोना ची साखळी तोडण्यासाठी आता राज्यातील बहुतांश शहरे लॉकडाऊनचा पर्यांय निवडताना दिसत आहेत. अगदी साथीचा आजार पसरावा तसे राज्यात सर्वत्र पुन्हा एकदा लॉकडाऊनचे आदेश निघाले आहेत. यावेळी लॉकडाऊन करण्यात मंत्री, आमदार-खासदार, नगरसेवक, सरपंच ह्या मंडळीनी पुढाकार घेतलाय. वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ मात्र लॉकडाऊन हा आता उपाय नाही, अशी मते मांडत आहेत. राज्य सरकारची टू बी ऑर नॉट टू बी अशी अवस्था होताना दिसत आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे तयार होत असलेले सामाजिक प्रश्न मोठे होवू लागले आहेत. रोजंदारीवरच्या कर्मचाऱ्यांना त्यांची चूल कशी पेटणार याची चिंता लागून राहिली आहे. सध्या 75 टक्‍क्‍यांहून अधिक महाराष्ट्र हळूहळू पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये जाताना पाहायला मिळतो आहे. 22 मार्चपासून सुमारे पाच महिने होत आलेत. लोकं ह्या न त्या स्वरूपातल्या लॉकडाऊनचा सामना करताहेत. लॉकडाऊन जाहीर करत असताना अधिकाऱ्यांत एक प्रकारची स्पर्धाचं सुरू असल्याचे दिसले. त्यातून कोरोना साखळी तात्पुरती ब्रेक होतो, मात्र लॉकडाऊन खुला होताच पुन्हा दुप्पट वेगाने रुग्ण वाढत जातात असा अनुभव असल्याने खरोखरच लॉकडाऊनचा उपयोग होतो का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेत ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या लॉकडाऊन लागू आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी याठिकाणी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर जालना, रायगड, परभणी, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात दहा दिवसांचा बंद असल्याने पाऊन कोटी लोक घरात बसून राहणार. सुमारे दोन लाख दुकाने, कारखाने, कार्यालये बंद राहणार आहेत. चलण ठप्प होणार असल्याने व्यापारी, उद्योजक चिंतेत आहेत.

लॉकडाऊन पुन्हा एकदा लागू झाल्याने अर्थव्यवस्था कशी सुधारणार? कंपन्या अविरत कश्या चालू राहणार? पैसेचं नसतील तर राज्य सरकार नवे कर्ज काढणार का? असे काही प्रश्न उभे राहिलेत. रोजंदारीवरचे मजूर, रिक्षाचालक, सलून चालक अश्या सगळ्यांनी काय करायचं? लॉकडाऊनमुळे काही मानसिक समस्या तयार होवू लागल्या आहेत.

लॉकडाऊन हा पर्याय आहे का?
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही. नागरिकांनीच कोरोनाचे गांभीर्य ओळखून नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाची साखळी तोडण्याकरीता लॉकडाऊन जाहीर करण्यात येतो. मात्र, आता लोकांची मानसिकताही घरात बसून राहण्याची राहिली नाही. गेल्या चार महिन्यांपासून घरात बसून असल्यामुळे अनेकांमध्ये नैराश्य आले आहे. तर बेरोजगारीची कुऱ्हाड अंगावर कोसळल्यामुळे अनेक संसार रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना सोबत आता जगायला शिकले पाहिजे, असेही काही तज्ज्ञ म्हणालेत.