कोरोनावर मात केल्यानंतर रक्तदाब वाढल्याने राजू शेट्टी हे रुग्णालयात

0
229

पुणे, दि. २८ (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब वाढला असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आलं. राजू शेट्टी यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ९ सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनावर मात केल्यानंतर आठवड्याभराने ते घरी परतले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवस घरी विश्रांती घेतली होती. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याने काळजीचं कारण नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.

कोरोनामधून बरे झाल्यानंर राजू शेट्टींनी विश्रांती घेतली होती. मात्र गेल्या महिन्याभरापासून ते पुन्हा शेतकरी प्रश्न घेऊन राज्यभर दौरा करीत आहेत. अलीकडे झालेल्या अतिवृष्टीनंतर त्यांनी राज्यात दौरा करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना प्रती हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी केली होती.
तर गेले दोन दिवस ते शेतकरी प्रश्नांसाठी दिल्ली येथे आंदोलनात सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी ते पुणे येथे दाखल झाले. नेहमीच्या तपासणीसाठी सायंकाळी चार वाजता ते डॉक्टरांना भेटणार होते. तर दुपारी बारा वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार होते.

मात्र सकाळी त्यांचा रक्तदाब वाढल्याने आणि दम लागत असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली. त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजू शेट्टी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे काही कारण नाही, असे निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.