कोरोनामुळे यंदा पतंग विक्रेत्यांवर संक्रांत

0
147

मुंबई, दि.१० (पीसीबी) : दरवर्षी मकरसंक्रांतीचे खास मुख्य आकर्षण म्हणजे आकाशात होणारी पतंगबाजी. मात्र, यंदा करोनाच्या अनेक नियमांमुळे पतंगक्रीडेबाबत सगळीकडे वातावरण उदासीन आहे. त्यातच भर म्हणून आता लोकलसेवा बंद असल्याने घाऊक पतंगविक्रेत्यांना पतंगीच्या मालाची ने-आण करण्यासाठी रस्ते वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र हा खर्च परवडत नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा पतंगविक्रीला ६० टक्क्यांचा फटका बसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. या परिस्थितीमुळे पतंग व्यावसायिकांकडून खंत व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वांद्रे येथील महाराष्ट्र काइटचे सलमान शेख म्हणालेत कि, ‘मुंबईच नव्हे तर देशभरात संक्रांतीच्या निमित्ताने पतंगोत्सव साजरा केला जातो. जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात पतंगाला मोठी मागणी असते, परंतु यंदा मुंबईतील वांद्रे, मोहम्मद अली मार्ग, धारावी इथल्या घाऊक पतंग व्यावसायिकांवर ग्राहकांची वाट पाहण्याची वेळ आली आहे. प्रवासात येणाऱ्या अडचणींमुळे मुंबईबाहेरून येणारे छोटे दुकानदार खरेदीसाठी फिरकत नसल्याची खंत इथल्या व्यापाऱ्यांनी मांडली. ‘संक्रांत आठ दिवसांवर आली तरी ४० टक्केही व्यवसाय होऊ शकला नाही. दरवर्षी या काळात आम्हाला जेवायलाही वेळ नसतो, पण यंदा आमचे डोळे फक्त ग्राहकांच्या वाटेकडे आहेत.’

बहुतांशी विक्रेते बरेली आणि उत्तर प्रदेशातून पतंगांची आयात करतात. शेख यांच्या ‘महाराष्ट्र काइट’ या कारखान्यात वर्षभर पतंग बनवण्याचे काम सुरू असते. साधारण तीन ते चार लाख पतंग वर्षभरात तयार केले जातात. संक्रांतीच्या काळात एक लाखांहून अधिक पतंगाची ते विक्री करतात, यंदा मात्र प्रतिसाद कमी असल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे ते डहाणूपर्यंतचे ग्राहक वांद्रे येथे, दादर ते कल्याणपर्यंतचे ग्राहक धारावीत तर दक्षिण मुंबईतला ग्राहकवर्ग मोहम्मद अली मार्ग येथे पतंग खरेदीसाठी जातो. यावर्षी लोकल सेवा बंद असल्याने घाऊक माल खरेदी करणारे छोटे दुकानदार येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर स्टँडर्ड काइटच्या झमीर शेख यावर म्हणाले कि, ‘करोनामुळे सहा महिने बाजारपेठ बंद होती. जनजीवन पूर्ववत होत आहे याचा अंदाज घेऊन बरेलीहून दरवर्षी इतकाच माल मागवला, परंतु त्यातील ७५ टक्के माल पडून राहिला आहे. पतंग नाजूक असल्याने आता वर्षभर या मालाची काळजी घ्यावी लागेल.’

‘पतंगांचा व्यापार किरकोळ आहे, हंगामी असल्याने होणारा नफाही किरकोळच असतो. आठशे हजार रुपयांमध्ये शेकडो पतंग येतात, पण ते नेण्यासाठी लोकल सेवा उपलब्ध नसल्याने खासगी वाहन करावे लागत आहे. त्यामुळे हजार रुपयांचे पतंग आणि प्रवासाला दोन हजार अशी परिस्थिती आहे. परिणामी, लांबून येणाऱ्यांनी पाठ फिरवली,’ अशी माहिती बाजारपेठेतील व्यावसायिकांनी दिली.