कोरोनानंतर मुंबईची लोकल कशी असेल ?

0
353

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – रोज सुमारे ७५ लाख लोकांची ने आण करणाऱ्या आणि गर्दीने खचाखच भरलेल्या मुंबईची लोकल ट्रेन सुरू झाल्यावर काय परिस्थिती असेल याची चिंता प्रशासनाला आणि तमाम जनतेलाही आहे. देशाची आर्थीक राजधानी असलेल्या मुंबईतील जनजीवन दोन महिन्यांपासून ठप्प आहे. उद्योग, व्यापार सुरू झाल्यावर लोकल नसेल तर सर्व व्यर्थ आहे. लोकल सुरू झाली तर त्यात दोन प्रवाशांतील पाच फुटाचे अंतर म्हणजेच सोशल डिस्टंन्सिंग कसे पाळणार हा प्रश्न गंभीर आहे. लोकलसाठी होणारी पळापळ, खचाकच गर्दी पाहिल्यावर यापुढे काय हा प्रश्न आहे. कोरोना इतक्यात संपत नाही, त्यामुळे तो रोखण्यासाठी जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक आहे.

कोरोना नंतरचा भारत कसा असेल, आपली जीवनशैली कशी राहील यावर सद्या मंथन सुरू आहे. उद्योगधंदे, शाळा महाविद्यालये, व्यापार संकुले, चित्रपटगृह अशा गर्दीच्या ठिकाणचे व्यवस्थापन कसे पाहिजे यावर आराखडा बनविण्याचे काम केंद्र, राज्य सरकारी पातळीवर नियोजन सुरू आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक करताना बस, रिक्षा, कॅबमध्ये एका सिटवर एक व्यकीत असेच बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता लोकल चा प्रवास कसा असेल आणि उपाय योजना करण्याची गरज आहे. कार्यालयांच्या वेळा बदलणे, कामाच्या वेळा १० तास ऐवजी सहा तास करण अथवा घरूनच काम करणे अशा नवनवीन कल्पाना समोर आल्या आहेत.

‘युरोपियन सेंटर फॉर डिसिझ प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल’ या संस्थेने कोव्हिडच्या साथीदरम्यान आणि त्यापुढच्या काळात सार्वजनिक वाहतूक कशी असायला हवी, याविषयी काही मार्गदर्शक तत्वे मांडली आहेत. त्यात प्रवाशांना सतत कोव्हिडच्या लक्षणांची माहिती दिली जावी. आजारी असल्यास प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळावा. तिकीट खिडकीजवळ आणि एरवीही प्रवाशांनी अंतर राखून उभं राहावं. प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर गर्दी जमा होऊ देऊ नये, किमान एक मीटर अंतर राखावं. स्टेशन परिसर आणि गाडीत मास्कचा वापर बंधनकारक, कर्मचाऱ्यांनाही मास्क उपलब्ध करून दिले जावेत. गाडीत एसीऐवजी हवा खेळती राहील याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी मोठ्या खिडक्या आणि छतावर झरोक्यांचा वापर करता येईल. प्लॅटफॉर्म, टॉयलेट्स, वेटिंग एरिया आणि गाड्यांचे डबे वारंवार स्वच्छ आणि निर्जंतुक करावे लागतील. विशेषतः प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यावर शेवटच्या स्थानकात गाडी निर्जंतुक केली जाईल. ठिकठिकाणी सॅनिटायझर किंवा हात धुण्याची सोय असेल, तर गाडीत चढण्यापूर्वी आणि उतरल्यावर लोक हात स्वच्छ करू शकतील. केवळ मर्यादित स्टेशनांवर आणि कंटेन्मेंट झोनमध्ये गाडी थांबवली नाही, तर तिथले लोक गाडीत चढणार नाहीत. अशा प्रकारच्या उपाययोजना मुंबईसारख्या शहरात लागू करणं हे खरं आव्हान आहे. प्रशासन आणि लोकांनी एकमेकांना साथ दिल्याशिवाय ते शक्य होणार नाही.