केरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा

0
881

तिरूअनंतपुरम्, दि. १८ (पीसीबी) – जलप्रलयाच्या संकटातून सावरण्याआधीच  केरळमधील जनतेला धडकी भरवणारा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुन्हा एकदा मुसळधार पावासाचा  अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमधील १४ पैकी ११ जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिरुअनंतपूरम, कोल्लम आणि कासारागॉड या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली नाही.   

महापूरात आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. अजूनही असे अनेक भाग आहेत जिथे लोक अडकून पडले आहेत. अन्न-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून देशाच्या वेगवेगळया भागातून केरळला अन्न-पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी केरळची हवाई पाहणी केल्यानंतर ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी मदत छावण्यांमध्ये आसरा घेतला आहे. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत २० हजार नागरिकांची सुटका करण्यात आली. ९०० जणांना एअर लिफ्ट करण्यात आले. देशाच्या वेगवेगळया भागातून केरळला धन-धान्याच्या रुपाने मदत पाठवण्यात येत आहे.