Maharashtra

केंद्रातल्या सरकारला फक्त गुजरातच्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता

By PCB Author

April 26, 2024

मत मागायला ही गुजरातलाच जा, इकडं कशाला येता? – डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल

गुजरातच्या दोन हजार टन कांद्यासाठी निर्णयात बंदी उठवल्यावर डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर निशाणा

दि २६ एप्रिल (पीसीबी ) शिरुर – महाराष्ट्रापेक्षा कमी कांदा उत्पादक शेतकरी हा गुजरात मध्ये आहे. तरी केंद्र सरकारने गुजरातच्या २ हजार टन कांद्याची निर्यात बंदी उठवली. मोदी सरकारला फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची चिंता असल्याचं या निर्णयाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे मत मागायला गुजरातलाच जा, इकडे येऊच नका. अशा खणखणीत शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यातीच्या धोरणावरून मोदी सरकारवर थेट हल्ला केला.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, शेखर पाचुंदकर, स्वप्नील गायकवाड,दामु घोडे, शंकर जांभळकर आदी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, तुमच्या माझ्या कांद्याची माती होती. तुमच्या माझ्या ताटात माती कालवली जाती, याच्याशी मोदी सरकारला काही देणंघेणं नाही. हे आजच्या निर्णयावरून मोदी सरकारने दाखवून दिलं आहे.जर मोदी सरकार फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असेल तर आपण पण त्यांना सांगू शकतो मत मागायला तिकडेच जा. इकडे येऊच नका. असं सांगत भाजपच्या या निर्णयाला डॉ. कोल्हे यांनी कडाडून विरोध केला.