Others

“कुशल संघटक, उत्तम वक्ते, शिस्तप्रिय, त्याग-सेवेची वृत्ती असणारे डॉ. हेडगेवार यांना आजच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!”

By PCB Author

April 01, 2021

आजच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

वेगळया व्यक्ती वेगळ्या वाटा:

समाज प्रबोधन व्हावे, ह्यासाठी समाज जागृती करण्यासाठी अनेक प्रकारचे समाज सुधारक वेळोवेळी समाजासमोर आले आहेत.  अशा व्यक्तींचा समाजावर फार मोठा प्रभाव पडत असतो. प्रत्येकाने आपापले क्षेत्र निवडलेले असते.  त्या त्या क्षेत्रात ती व्यक्ती आपल्या कार्याचा ठसा उमटवून जात असते.

डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक.  १ एप्रिल १८८९ रोजी ह्यांचा जन्म. संघटने मध्ये सामर्थ्य असते अन् ते ओळखून  जनतेच्या कल्याणासाठी संघटना स्थापन करणारे हिंदू धर्म पुनरुज्जीवनवाद आणि सुधारणा ही चळवळ हाती घेणारे. डॉ. हेडगेवार.  कुशल संघटक, उत्तम वक्ते, शिस्तप्रिय , त्याग , सेवा , समर्पण वृत्ती असणारे असे डॉ.हेडगेवार.  अवघ्या दहा मुलांना बरोबर घेऊन  नागपूर येथे एका वाड्यात स्थापन केलेली ही  संघटना म्हणजे “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ”.  त्यांनी लावलेल्या वटवृक्षाची आज पाळेमुळे खोलवर रुजली आहेत., सर्वत्र विस्तारली आहेत. देशातच नव्हे तर जगभरात आज आर. एस. एस. चे स्वयंसेवक अन् शाखा आपले राष्ट्रोद्धार चे कार्य करीत आहेत.

शालेय जीवनात त्यांनी ” वंदे मातरम् ” ह्या मंत्राचा ध्यास घेतला होता. इंग्रज सरकारच्या विरोधी त्यांनी कृती करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे आंदोलने केली अटकही झाली. भाषण बंदी सुद्धा त्यांचेवर असायची. काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व चळवळीत ते भाग घेत असायचे.  काही क्रांतीकारक काँग्रेस पक्षाच्या धोरणास विरोध दर्शवून त्यातून बाहेर पडले. त्यामध्ये डॉ.हेडगेवार सुद्धा होते.

कलकत्ता येथे उच्च शिक्षणासाठी गेले. डॉक्टर ही पदवी त्यांनी मिळवली. तेथे त्यांचा परिचय काही स्थानीय क्रांतीकारक म्हणून ओळखले जाणारे अरविंद घोष , श्यामसुंदर चक्रवर्ती , मुखर्जी अशा प्रभृती बरोबर झाला. तेथून ते नागपूर येथे आले अन् आजन्म अविवाहित राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे माध्यमातून ते कार्य करू लागले. “हिंदुराष्ट्रचा आधारस्तंभ” असा त्यांचा गौरव स्वा. वीर सावरकर करीत. देशाच्या कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या संकटात निस्वार्थी पणाने आर एस एस आपले तन मन धन अर्पण करून आपले मातृभूमी ची सेवा प्रथम हे कर्तव्य जबाबदारीने पार पाडीत आहे. कोणी काहीही म्हणो किंवा कसेही वागो आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करायचे असते. त्यांची हीच शिकवण हा संघाच्या विचारशक्तीचा पाया आहे. त्यांचे निधन २१ जून १९४० रोजी झाले.

डॉ.केशव बळीराम हेडगेवार ह्यांच्या आजच्या जन्मदिनी त्यांचे चरणी त्रिवार वंदन !!