कुलगाममध्ये ५ अतिरेक्यांना कंठस्नान; ४८ तासात जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत १३ जण ठार

0
457

श्रीनगर, दि. १५ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला मोठे यश आले आहे. कुलगामच्या चौगाम येथे आज झालेल्या चकमकीत ५ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ही चकमक सुरू असतानाच कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने बारामुल्ला आणि कांजीगुंड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या ४८ तासात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत १३ जण ठार झाले आहेत.

चौगाम येथे सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवानही जखमी झाले आहेत. घटनास्थळावरू आतापर्यंत तीन अतिरेक्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. चकमकीनंतर या संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून शोध मोहीम सुरू आहे. पहाटेपासूनच चकमक सुरू झाल्याने बारामुल्लातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने बारामुल्ला आणि कांजीगुंड एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

अतिरेकी लपल्याची खबर मिळाल्यानंतर आज पहाटे पासूनच सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरू केलं. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. गुरुवारीही सुरक्षा दलाने तीन अतिरेक्यांचा खात्मा केला होता. त्याच्या एक दिवस आधीही अतिरेक्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या होत्या.