“किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा गाजणार कारण….”

0
185

कोल्हापूर, दि.२३ (पीसीबी) : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा गाजणार आहे. कारण मुरगूड नगरपालिकेने सोमय्यांच्या प्रवेश बंदीचा ठराव मंजूर केला आहे. मुरगूड शहरात सोमय्या यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुरगूड नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी झालेल्या ठरावात किरीट सोमय्यांना एन्ट्री द्यायची नाही, असा ठराव एकमताने पारित करण्यात आला. मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर असलेले किरीट सोमय्या मुश्रीफांविरोधात तक्रार देण्यासाठी मुरगुड पोलीस ठाण्यात जाण्याच्या तयारीत आहेत. सोमय्यांचा नियोजित दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ठराव मंजूर केला आहे.

किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. कोल्हापुरात जाऊन पाहणी करण्याचा सोमय्यांनी चंगच बांधला. पण पुढे महाविकास आघाडीने देखील आक्रमक पवित्रा घेतला आणि सोमय्यांना कोल्हापुरात न जाता कराडमध्येच थांबावं लागलं. पण यादरम्यान कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे समर्थक आणि मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता याच्याही पुढे जाऊन मुरगूड शहरात सोमय्या यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

येत्या गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून 27 तारखेला उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळ्यांची पाहणी करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करण्यास जाणार असून अडवून दाखवा, असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराडमध्ये पोलिसांनी उतरवलं होतं. ते कोल्हापूरला निघाले होते. पण कराडमध्ये उतरवल्यानंतर तिथेच 20 सप्टेंबरला सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. गडहिंग्लज कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करत हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितला.

सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 20 तारखेला सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. सोमय्यांनी त्याच कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत मुश्रींफांविरोधात दंड थोपटत कायद्याच्या लढाईला तयार राहण्याचं आव्हान दिलं.