नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून काही लोक अद्याप बाहेर पडू शकलेले नाहीत असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या. तर भाजपा आणि घटकपक्ष यांच्या जागांची संख्या ३५० च्या पुढे गेली. काँग्रेसचे या निवडणुकीत अक्षरशः पानिपत झाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडमध्ये आले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरस्कार आणि द्वेष यांचे राजकारण केले. तसेच देशाच्या जनतेशी खोटे बोलून नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली असा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून काही लोक लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून बाहेरच आलेले नाहीत असा टोला लगावला आहे.
मी देशामध्ये तिरस्कार आणि द्वेष यांचे विष पसरवले असे विरोधकांना वाटत असेल तर काहीही करू शकत नाही. कारण त्यांची बाजू कमकुवत आहे. आमच्यासाठी आता निवडणूक हा विषय संपला आहे. १३० कोटी भारतीय नागरिकांचा विकास साधणे हे आता आमच्या पुढचे लक्ष्य आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.