नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – भारतीय संघ महिला टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून स्पर्धेबाहेर पडला आहे. या सामन्यात अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार मिताली राज हिला संघातून वगळण्यात आले होते. यावरून मिताली राज हिने संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार आणि प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडलजी याच्यावर आरोप केले आहेत. ‘काही लोकं मला संपवायला टपले आहेत’, असा आरोप तिने केला आहे.
दरम्यान, मिताली राज हिला संघातून वगळण्यात आल्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. याबाबत मितालीने बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक साबा करीम यांना पत्र लिहून आपली तक्रार मांडली आहे.
प्रशिक्षक रमेश पोवार यांनी माझा अपमान केला. त्यांनी मला संघाबाहेर ठेवले. हरमनप्रीतशी माझे काहीही भांडण नाही. पण तिने मला वगळण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला, हे मला खटकले. त्यात भर म्हणून माजी कर्णधार आणि प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडलजी यांनी माझ्याविरोधात आपल्या पदाचा गैरवापर केला आणि मला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाला एकप्रकारे सहकार्यच केले, असाही आरोप तिने केला.