नाशिक, दि. १६ (पीसीबी) – कोल्हापूर, सांगलीसह राज्याच्या अनेक भागात पूरस्थिती बिकट आहे. लाखो लोकांना महापुराचा तडाखा बसला आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भाजप सरकार चांगले काम करत आहे. पण काहीजण आम्हीच ज्ञानी आहोत, अशा अविर्भावात काम करत आहेत, असा टोला राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.
विखे-पाटील नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
सर्व बाजूंनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र, ही मदत योग्यरितीने पूरग्रस्तांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतलेली नाही, अशी टीका शरद पवार यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेताना सरकारवर केली केली होती. या टीकेला विखे-पाटलांनी चोख उत्तर दिले आहे.
महापूरात शेती, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांसाठी सरकार योग्य काम करत आहे, असे सांगून विरोधी पक्षातील नेते आपणच खूप ज्ञानी असल्यासारखे वागत आहेत. पण त्यामध्ये काही विशेष नाही, विरोधी पक्षांचे ते कामच असते. मी पण विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले आहे, असेही विखे-पाटील म्हणाले.