काश्मीरमध्ये २४ तासांत ४ दहशतवादी ठार; सीमेवर चकमक सुरूच

0
458

श्रीनगर , दि. २२ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात ४ चकमकी झाल्या आहेत. आता पुन्हा शोपियान जिल्ह्यातील इमाम साहबमध्ये चकमक सुरू झाली असून त्या ठिकाणी २ ते ३ दहशतवादी लपल्याची माहिती आहे. बांदीपोरा या ठिकाणी झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे दोन दहशतवादी मारले गेले असून यात लष्करचा टॉप कमांडर अली भाई याचा खात्मा करण्यात जवानाला यश मिळाले आहे. 

बारामुला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. २४ तासात चार चकमकी झाल्या असून आतापर्यंत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच या चकमकीत भारताचा एक अधिकारी आणि तीन जवान जखमी झाले आहेत. चकमकीत मारला गेलेला अली भाई हा पाकिस्तानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. बारामुलाच्या कलंतरा परिसरात दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती श्रीनगर येथील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल कालिया यांनी दिली आहे. चकमकीदरम्यान जखमी झालेल्या जवानांवर ९२ बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.