काळेवाडीत शाळेकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अडवला; माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीरांची आयुक्तांकडे तक्रार

0
1461

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने वर्षानुवर्षे डांबरीकरण केलेल्या जागांचा मालकी हक्क नेमका कोणाकडे आहे, असा संतप्त सवाल माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केला आहे. डांबरीकरण केलेल्या जागांचे मूळ मालक अरेरावी करत सार्वजनिक रस्ते अडवित आहेत. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांसह रहिवाशांना होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलेआहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

मच्छिंद्र तापकीर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “ग्रामपंचायत, नगरपालिका ते महापालिका असा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रवास झाला आहे. खेड्यापाड्यांचे महानगरात रुपांतर होत असताना अनेक स्थानिकांनी रस्त्यांसाठी आपल्या जागा महापालिकेला दिल्या. त्यामुळे रस्तेविकास मोठ्या प्रमाणावर झाला. काहींनी विनाअट, विनामोबदला जागा दिल्या. रस्तेविकासामुळे झपाट्याने विकास झाला. महापालिकेने कोणतेही आढेवेढे न घेता मुरुमीकरण, डांबरीकरण केले. काही ठिकाणी अधिकृत बांधकाम परवानग्याही दिल्या. त्यामुळे नागरिकरण मोठ्या प्रमाणावर झाले. आता काही मूळ मालक रहिवाशांना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने डांबरीकरण केलेले सार्वजनिक रस्तेच अडवित आहेत. त्यामुळे रहिवाशांची कोंडी होत आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावरही त्याची दखल घेतली जात नाही. स्मार्ट सिटीकडे पिंपरी-चिंचवडची वाटचाल सुरु असताना रस्त्यांसाठी होणारी अडवणूक संतापजनक आहे. महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा वापर करुन सार्वजनिक रस्ते पुर्ववत खुले करावेत, मूळ जागामालकांनी महापालिकेशी संपर्क साधत जागेचा मोबदला घ्यावा व नागरिकांना विनाकरण मनस्ताप देऊ नये.

काळेवाडीतील तापकीरनगरमध्ये लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर आणि एलबीटी इंग्लिश मीडियम स्कुल असा शैक्षणिक परिसर आहे. आजुबाजूच्या परिसरात १०० घरे आहेत. या परिसरासाठी २० वर्षांपुर्वी सार्वजनिक रस्त्याची निर्मिती झाली. डांबरीकरण झाले. आता काहीजण हा सार्वजनिक रस्ता खडीमुरुम टाकून अडवित आहेत. त्यामुळे सुमारे २ हजार ६०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. रहिवासी मेटाकुटीस आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांच्या ’धृतराष्ट्र’ भुमिकेमुळे प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमावर अनिश्तिततेचे सावट आले आहे. महापालिकेने पुढाकार घेत सार्वजनिक रस्ता खुला न केल्यास तापकीर चौकात विद्यार्थी-पालकांसह ध्वजवंदन कार्यक्रम घेण्याचा इशारा मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे.”