कात्रजमध्ये पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

0
368

पुणे, दि. १९ (पीसीबी) – मित्रासोबत लपाछपा खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून एका ११ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना कात्रजमधील भिलारवाडी येथे घडली.

स्वराज माधव खवले (वय ११, रा.भिलारवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तो पाचवीमध्ये शिकत होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळाची सुट्टी लागल्याने स्वराज व त्याचे मित्र घरापासून काही अंतरावर असलेल्या एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ठिकाणी खेळायला जात होते. नेहमीप्रमाणे स्वराज व त्याचे मित्र ७ मेला सायंकाळी सात वाजता बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ठिकाणी लपाछपी खेळण्यास गेले. स्वराजवर राज्य आले, त्यामुळे तो लपण्यासाठी गेला. अंधार असल्याने त्यास पाण्याच्या टाकी लक्षात आली नाही. टाकीवर झाकण नसल्यामुळे तो पाण्यात पडला. त्याच्या मित्रानी तत्काळ घरच्यांना सांगितले, त्यानंतर त्यांनी स्वराज यास पाण्यातुन बाहेर काढले, दवाखान्यात नेले, मात्र उपचार सुरु असताना दोन तासांनी त्याचा मृत्यु झाला.