मुंबई, दि. २१ (पीसीबी) – देशातील विरोधी पक्ष कमी पडत आहे, हे खर आहे, परंतू काँग्रेस आणि राष्ट्रवादी सध्या काय करत आहेत, याच्याशी मला काही कर्तव्य नाही. काँग्रेस राष्ट्रवादीशी माझे कसलेही नाते नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत राज यांनी भाजपविरोधी प्रचारसभा आणि काँग्रेस- राष्ट्रवादीसाठी प्रचार करत असल्याच्या आरोपांवर भाष्य केले.
राज म्हणाले की, सत्ता ज्या पक्षाची असते त्यांना प्रश्न विचारायचे असतात. आत्ता भाजपची सत्ता आहे म्हणून त्यांना प्रश्न विचारत आहे. उद्या जर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली, तर त्यांना देखील प्रश्न विचारेल, असे ते म्हणाले. माझ्या सभांचा फायदा कुठल्याही पक्षाला झाला, तर होऊ द्या पण मोदी आणि शहा ही दोन माणसे राजकीय क्षितीजावरून दूर झाली पाहिजेत, असेही राज ठाकरे म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात पाऊल ठेवले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यांना राजकीय सोयीनुसार पवार चालतात. पण मी काही बोललो, तर मी त्यांची सुपारी घेतली, असे ते म्हणतात, असेही राज म्हणाले.