पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्यातच अनेक पक्षांची अवस्था सैरभैर झाली आहे. तर आताच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पेक्षा काळू-बाळूचा तमाशा बरा, करमणूक तरी होत होती, असे खोचक टिप्पणी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज (मंगळवार) येथे केली.
पिंपरीमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी शिवसेना – भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बापट म्हणाले की, काँग्रेस देशातील एकमेव पक्ष होता, त्यामुळे त्याला दुसरा कोणताही सक्षम पर्याय नसल्याने प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस निवडून यायची. त्यानंतर अनेक छोट्या छोट्या पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसविरोधात लढा दिला. त्यामुळे ७० वर्षात काँग्रेस इतके वाईट हाल कोणाचेच झालेले नाहीत, असे ते म्हणाले.
देशात सध्या राजकीय स्थिती अस्थिर आहे. गेल्या वेळे पेक्षा भाजप- शिवसेनेचे अधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास बापट यांनी यावेळी व्यक्त केला. ७० वर्षांमध्ये यांच्या बापाला जमले नाही, ते भाजप सरकारने करून दाखवले आहे, असे बापट म्हणाले.