अहमदनगर, दि. ९ (पीसीबी) – पुरोगामी लोकशाही आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे विचार आणि तत्त्व एकच आहेत. आम्ही आघाडी म्हणूनच काम करत आहोत. दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचा विषय कोठेही चर्चेत आलेला नाही. त्यामुळे यावर वक्तव्य करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे भविष्यात विलिनीकरण होईल, असे सोलापूरातील एका सभेत म्हटले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत. भविष्यात आम्ही एक होणार, असेही त्यांनी म्हटले होते.
यावर प्रतिक्रिया देताना थोरात संगमनेरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ११९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर दोन्ही पक्ष आघाडीत काम करीत आहेत. आमचे विचार एकच आहेत. सध्या तरी दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचा विषय कोठेच आलेला नाही. मात्र, काळाच्या ओघात काय होईल सांगता येत नाही. तरीही त्यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही.