काँग्रेसवाल्यांसाठी भाजप हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये – शिवसेना

0
402

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्म वाक्य नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी  आहेत. भाजप किंवा शिवसेना ही काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये, असे मत शिवसेनेने ‘सामना’च्या  अग्रलेखातून व्यक्त केले आहे.  

सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपाच्या दारात रांगा लावून उभे आहेत व त्याचा आनंद मुख्यमंत्री व इतर मंडळींच्या चेहऱ्यावर दिसत आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजांना घेऊनच हिंदुत्ववादी पक्षांना पुढे जायचे असेल, तर ज्यांनी वर्षानुवर्षे विचारांचा भगवा झेंडा हाती घेतला त्यांनी काय करायचे? असा सवाल शिवसेनेने भाजपला  केला आहे.  काँग्रेसच्या घराण्यांविरोधात आपला संघर्ष होता, याचीही आठवण शिवसेनेने भाजपला करुन दिली आहे.