काँग्रेसच्या निर्णयानंतरच पुढचा निर्णय घेऊ : नवाब मलिक

0
406

मुंबई, (पीसीबी) : सरकार शिवेसेनेसोबत बनवणार हे जरी खरं असले तरी काँग्रेसचा निर्णय होईपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर नवाब बोलत होते.

नवाब म्हणाले, आज सकाळी पक्षाची बैठक झाली. बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच दिल्लीतही काँग्रेसच्या कार्यकारी कमिटीची चर्चा झाली आहे. काँग्रेसकडून जोपर्यंत अधिकृत निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही भूमिका घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुक ही काँग्रेससोबत लढवल्याने त्यांचा निर्णय आल्याशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही. शिवसेनेसोबत सरकार सत्तास्थापन करण्यास राष्ट्रवादी तयार असली तरी काँग्रेसच्या निर्णय आल्यानंतरच राष्ट्रावादी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेनं एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, केंद्रात मंत्री असलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे. तर भाजपाचा मुख्यमंत्री नको, असं राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व पक्षांच मत असल्याच सांगत शिवसेनेना सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृत प्रस्ताव देण्यात आला आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेकडे आता अवधे साडे चार तास उरले आहे.