काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता; मुख्यमंत्र्यांचा आरोप  

0
482

नागपूर, दि. २० (पीसीबी) –  भाजपने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले आहे. काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणूनच वापर केला, असे सांगून काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता. त्यामुळेच केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळू शकली नाही, असा आरोप   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) येथे केला.

भाजपच्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, भाजप सरकारमुळे इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत आहे. २०२० ला हे स्मारक पूर्ण होईल,  असा विश्वास  त्यांनी यावेळी व्यक्त केला.   भाजपाचे सरकार सत्तेवर येताच स्मारकाला जागा मिळाली. तसेच  मोठ्या प्रमाणात निधीही मिळाला. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या आई-बापांचे स्मारक उभा केले. पण त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा दिली नाही, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाआघाडीवर तोफ डागली. हे सर्व पक्ष परिवाराचे पक्ष आहेत. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्यांना सत्तेत बसवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबीतून आलेले आहेत. त्यांना गरिबांचे दु:ख माहीत आहे. मोदींनी उज्वला योजनेच्या माध्यमातून घराघरापर्यंत गॅस नेला. प्रत्येकाच्या घरी वीज पोहोचवण्यात आली, असे ते म्हणाले.