कष्टकऱ्यांनी राजकीय भूमिका घेण्याची गरज – बाबा कांबळे

0
475

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून गरिबी हटाओचा नारा सुरु आहे. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. वेगवेगळ्या पक्षांची आलटून पालटून सत्ता आली. सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्ष गरिबी हटवू असे, पोकळ आश्वासन देतात. मात्र एवढी वर्षे लोटूनही गरिबी जैसे थेच आहे. त्यामुळे आता राजकीय भुमिका घेण्याची वेळ कष्टकऱ्यांवर आली आहे. राजकीय भुमिका घेऊन आपले प्रश्न आपणच सोडवू, असे आवाहन कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

देशात अब्जाधीशांची संख्या वाढत आहे. १०२ वरून १४३ वर अब्जाधीशांची संख्या वाढली आहे. गरीब अधिक गरीब होत आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. त्यामध्ये आले. परिणामी गरिबांची संख्या अधिकच वाढली असल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमातून समोर येत आहेत. भारतात २०२० मध्ये ४ कोटी ६० लाख लोक गरिबीच्या खाईत लोटले गेल्याचे समोर आले आहे. गरीबी हटावचा नारा स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. परंतु अजूनही गरिबी कमी होताना दिसत नाही. सरकारचे धोरण गरिबांच्या बाजूने दिसत नाही. देशांमध्ये सुमारे 40 कोटी असंघटित कामगार, कष्टकरी यांचे प्रश्न सोडवले गेले नाही. त्यांच्या प्रश्नांसाठी कष्टकरी कामगार पंचायत काम करत आहे. कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना गरिबांच्या प्रश्नांची जाण राहत नाही. कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची उदासीनता सत्ताधाऱ्यांमध्ये दिसत असल्याचे कांबळे म्हणाले.

त्यामुळे गरिबांचे प्रश्न राजकीय मुख्य पटलावर आणणे गरजेचे आहे. कष्टकरी कामगारांनी, रिक्षाचालक, फेरीवाल्यांनी एकत्र येऊन राजकीय भूमिका घेण्याची गरज आहे. आपले प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी आता राजकीय भूमिका घेतल्याशिवाय गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे बाबा कांबळे म्हणाले. अन्यथा गरिबांना आणखीनच गरीब म्हणून जगावे लागेल, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.