Maharashtra

कमल हसन सारख्या लोकांची तोंडं कायमची बंद केली पाहिजे- संजय राऊत

By PCB Author

May 14, 2019

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – अभिनेता कमल हासन यांनी गांधीहत्येबद्दल वक्तव्य करून ऐन निवडणुकीत हिंदू दहशतवादाच्या राजकारणाला हवा दिली आहे. प्रचारसभेत बोलताना त्यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असे सांगत वादाची ठिणगी टाकून दिली. त्यामुळे निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करून अशा लोकांची तोंड कायमची बंद केली पाहिजे, अशी  प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी  दिली आहे.  

चेन्नईतील अरिवाकुरुची विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत कमल हासन बोलताना म्हणाले होते की, नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांची हत्या करणारा स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी होता आणि तो हिंदू होता. इथे मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मी हे बोलत नाही. तर महात्मा गांधीच्या पुतळ्याखाली उभा असल्याने मी हे बोलत आहे, असे हासन म्हणाले होते. यावर राऊत यांनी हसन यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, कमल हसन यांच्या वक्तव्यानंतर अखिल भारतीय हिंदू महासभेने त्यांना जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ‘गोडसे यांच्याविषयी असे वक्तव्य करणारे व्यक्ती हिंदू धर्माला कलंक आहे, असे अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी मेरठ येथे  म्हटले आहे.