सोलापूर, दि.११ (पीसीबी) – गावात एकच बस थांबते. त्यामुळे दुसऱ्या बसलाही थांबा देण्यात यावा, म्हणून पेन्नूरमधल्या प्रेरणा गवळी या शाळकरी मुलीने थेट आमदारालाच पत्र लिहिले. पहिल्या पत्राला उत्तर आले नाही म्हणून प्रेरणा दुसरे पत्र लिहिले. यावेळी तिच्या पत्राची लागलीच दखल घेतली गेली. आमदारांनी पंढरपूरच्या आगारप्रमुखांना फोन केला आणि सोलापूर-पंढरपूर बसला पेन्नूरला बस थांबा सुरू करण्याची सूचना केली. हे एवढ्यावरच थांबले नाहीतर त्या आमदारांनी प्रेरणाला पत्र लिहिले. ज्यात नागपूरच्या अधिवेशनात असल्याने पहिल्या पत्राला उत्तर देऊ शकलो नाही, असे स्पष्टीकरणही दिले. साधेपणा आणि मातीशी नाळ राखण्याच्या स्वभावामुळेच लोकांनी त्यांना ११ वेळा आमदार बनवून विधानसभेवर पाठवले. हे आमदार दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत, सांगोल्याचे गणपतराव देशमुख!
गणपतराव देशमुख यांचा जन्म १९२७ सालचा. मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर असलेलं पेन्नूर हे त्यांचे गाव. मॅट्रिकचे शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केले. याच काळात त्यांचा स्वातंत्र्य चळवळीकडे कल वाढला. काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मोरे, नाना पाटील यासारख्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि ते या विचारधारेकडे झुकले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधु अप्पासाहेब पवार आणि गणपतराव देशमुख रूममेट होत. तर स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल टाकत १९६२ची विधानसभा निवडणूक लढवली आणि ते सांगोल्याचे आमदार झाले. त्यांची ही वाटचाल दोन निवडणुका सोडल्या तर सुरूच आहे. आमदार होऊन पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या गणपतरावांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर केलेल्या भाषणाबद्दल यशवंतराव चव्हाण यांनीही त्यांचं कौतूक केले होते.
गणपतराव देशमुखांनी महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणुक लढवली आणि जिंकलेही. त्यानंतर दोन निवडणूका सोडल्या तर तब्बल ११ वेळा ते आमदार झाले. म्हणजे ५० वर्षांहून अधिक काळ ते विधानसभेचे सदस्य आहेत. या काळात त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केलं. विशेष म्हणजे लोकांच्या हिताची कामं करण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेतात. लोकसेवेचा हा वसा ते आजही चालवत आहेत.
एकाच पक्षात राहून ११ वेळा आमदार झालेल्या गणपतराव देशमुख यांनी आमदारकी कधीही डोक्यात जाऊ दिली नाही. सहकाराबरोबर तालुक्याच्या पाण्यासाठी आणि इतर विकास कामांसाठी ते हिरारीने पुढाकार घेतला. विरोधी पक्षात राहूनही कामं करता येऊ शकतात हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले. विशेष म्हणजे आजघडीला मतदारसंघाचा विकास करायचा म्हणून भाजपात जात असलेल्या प्रतिनिधींसाठी आदर्श असं उदाहरण आहे. मंत्रीपदं गेल्यानंतर लागलीच शासकीय गाड्यांचा त्याग करणाऱ्या गणपतरावांनी आयुष्यभर एसटीनेच प्रवास केला. आजही त्यांचा मतदारसंघातील लोकांसोबतचा संवाद थांबलेला नाही. वयाच्या ९४ व्या वर्षी गणपतरावांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, लोक उमेदवारी अर्ज भरेपर्यंत लोक त्यांच्याकडे निवडणूक लढवावी असा हट्ट धरून बसले होते. आमदारकीसाठी पक्ष सोडणाऱ्या आजच्या राजकीय काळात गणपतराव देशमुखांनी एका पक्षात राहुन निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. अगदी मोदी लाटेतही आबासाहेबांना लोकांनी आमदार केले.