कंपनीतील सुरक्षा रक्षकास कामगारांकडून मारहाण

0
225

चाकण, दि. २५ (पीसीबी) – मोबाईल चेकिंगमध्ये पकडल्याच्या रागातून चार कामगारांनी कंपनीतील सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २४) दुपारी साडेतीन वाजता महाळुंगे येथील एच पी चौकात घडली.

ध्रुवकुमार नवलकिशोर तिवारी (वय ३५, रा. निघोजे, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश सुभाष वाघ आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तिवारी हे सुरक्षा एजन्सीतर्फे महाळुंगे येथील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. कंपनीत येणाऱ्या कामगारांची चेकिंग करताना तिवारी यांना एका कामगाराचा मोबाईल फोन सापडला होता. त्याचा राग कामगार आकाश वाघ याच्या मनात होता. तिवारी काम संपल्यानंतर शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घरी जात होते. ते एच पी चौकात आले असता आकाश वाघ त्याच्या तीन साथीदारांसोबत आला. चेकिंग मध्ये मोबाईल फोन पकडल्याच्या कारणावरून तिवारी यांना चामडी पठ्ठा आणि ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.