औरंगाबादमध्ये कुटूंबाला संपवून विवाहीत तरुणाची आत्महत्या

0
1161

औरंगाबाद, दि. ३१ (पीसीबी) –  पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन एका विवाहीत तरुणाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना औरंगाबादमधील फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंपरी येथे घडली.

पती कृष्णा तायेराव देवरे (वय ३०), पत्नी शिवकन्या कृष्णा देवरे (वय २७) आणि मुली सर्वदा कृष्णा देवरे (वय ६), हिंदवी कृष्णा देवरे (वय ४) असे एकाच कुटूंबातील मयतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कृष्णा देवरे याने पहिले आपल्या दोन चिमुकल्या सर्वदा आणि हिंदवी या दोघींना गळफास देऊन ठार केले. तसेच पत्नी शिवकन्या यांच्या डोक्यात कुदळीने वार करुन जीव घेतला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  दरम्यान, कृष्णा देवरेने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत ‘पोलिसांना फोन लावा, तेव्हा दरवाजा उघडा, राम राम राम राम ‘ असे लिहिले आहे. या चिठ्ठीतील मजकुराचा अर्थ काय आणि कृष्णाने स्वत:सह कुटुंबाला का संपवले हे अद्याप समजलेले नाही. फुलंब्री पोलिस तपास करत आहेत.