Maharashtra

एवढाच ‘जोश’ असेल तर सीमेवर जा; शहीद पत्नीने ‘सोशल’वरील वीरांना सुनावले

By PCB Author

March 01, 2019

नाशिक, दि. १ (पीसीबी) – सोशल मीडियावर रोज ‘युद्ध’ लढणाऱ्यांना मला एवढेच सांगायचे आहे की यातून काहीच साध्य होणार नाही. तुमच्यात एवढाच जोश असेल तर सीमेवर लढायला जा म्हणजे खरी परिस्थिती कळेल’ अशा शब्दात विजेता यांनी सोशल मीडियावरील थिल्लरगिरीवर टीका केली आहे. निनाद यांच्या मृत्यूमुळे मांडवगणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

पाकिस्तानातील जैशच्या तळांवर मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलाने बॉम्ब वर्षाव केला. त्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं भारतीय सीमेत बुधवारी सकाळी घुसली. या विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देत पळवून लावले. पण यामध्ये भारताची दोन मिग २१ विमानं कोसळली. एक विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले तर दुसरे भारतातील काश्मीरमधील बडगाममध्ये कोसळले. या अपघातात स्क्वॅर्डन लिडर निनाद मांडवगणे शहीद झाले. त्यांच्या मृत्यूमुळे न भरून निघणारे नुकसान झाले आहे अशी भावना विजेता यांनी व्यक्त केली आहे. निनाद मांडवगणे यांचे एका महिन्यापूर्वीच काश्मीर येथे पोस्टिंग झाले होते. ‘ बदली झाल्यापासून ते नित्य माझ्या संपर्कात होते. मुलगी वेदिताशीही ते रोज बोलत असते. २० फेब्रुवारीला वेदिताला त्यांनी दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यांचा बराच वेळ मुलीशी बोलण्यातच जात असे’ अशा शब्दात विजेता यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या.