एल्गार परिषदेशी संबंधित असलेल्या ‘त्या’ पाच जणांना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश

0
834

मुंबई, दि. २९ (पीसीबी) कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी एल्गार परिषदेला दोषी  ठरवत  परिषदेशी संबंधित कार्यकर्त्यांचे व बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे लागेबांधे असल्याचे पोलिसांना आढळले होते. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी देशभरात विविध ठिकाणी कारवाई करत नक्षलींशी संबंध असल्याचा ठपका ठेवत पाच जणांना अटक केली होती. या पाच जणांना ५ सप्टेंबरपर्यंत नजर कैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

अटक  केलेल्यामध्ये वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा व वर्नन गोन्सालवीस या पाच जणांचा समावेश होता. या पाचही जणांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे  दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारला यासंदर्भात दोन दिवसांत आपली बाजू मांडण्याचा आदेशही देण्यात आला  आहे.

या पाच जणांच्या अटकेविरोधात इतिहासकार रोमिला थापर यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात  दाद मागितली होती. विशेष म्हणजे माओवाद्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजीव गांधी यांच्याप्रमाणे हत्या घडवून आणण्याचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र, याप्रकरणी आता पुणे पोलिसांना पुढील तपासासाठी पाच सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.